मुख्य बातम्या

“उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का ?” राज ठाकरेंविरुद्धच्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सवाल

nyaymurti bhushan gawai nyaymurti bhushan gawai file photo
Spread the love

नवी दिल्ली : मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून हिंदी व मराठी (Marathi) भाषेवरुन वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, मनसेचे पदाधिकारी काही हिंदी भाषिक किंवा अमराठी व्यापाऱ्यांना किंवा मराठी न बोलणाऱ्यांना मारहाण करत असल्याचं सोशल मीडियातून समोर आलं होतं. तर, ठाकरे बंधुंनी मराठीच्या मुद्द्यावरुन मेळावा घेतल्यानंतर केलेल्य भाषणावर आक्षेप घेत राज ठाकरेंविरुद्ध (Raj Thackeray) न्यायालयात याचिका (PIL) दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपन्न झाली असून न्यायालयाने याचिकाकर्त्यास फटाकरले आहे. “उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का ?”, असा प्रश्न सरन्यायाधीशांनी (Supreme court) याचिकाकर्त्यास विचारला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश भूषण गवई आणि के. विनोद यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यामध्ये, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. तसेच, याचिकाकर्त्यास उच्च न्यायालयात जाण्याचे स्वातंत्र्य देत सर्वोच्च न्यायालयाने याचिका मागे घेण्याचे सूचवले आहे. त्यानंतर, याचिकाकर्त्यांनी याचिका सर्वोच्च न्यायालयातून काढून घेतल्याची माहिती आहे.

राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून महाराष्ट्रातील हिंदी भाषिक नागरिकांविरुद्ध हिंसाचार भडकवल्याचा आणि भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत मनसे प्रमुखांविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी शुक्रवारी18 जुलै 2025 रोजी ही याचिका दाखल केली होती. त्यावर, सर्वोच्च न्यायालयाच आज सुनावणी झाली. त्यामध्ये, याचिकाकर्त्यास उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज ठाकरेंचा मेळावा, पदाधिकाऱ्यांना सूचना
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईत आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या बैठकीत प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला होता, त्यामुळे फक्त पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्तेच उपस्थित होते. मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे. “20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग तुम्ही एकमेकांशी का भांडता?” असा सवाल करत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मतभेद विसरून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. आपला पक्ष मुंबईत सर्वात जास्त बलवान आहे. विनाकारण कोणाला ही मारू नका आधी समजवून सांगा, मराठी शिकायला बोलायला तयार असेल तर शिकवा. उर्मट बोलत नसेल तर वाद घालू नका, पण उर्मट बोलला तर मग पुढे तशी भूमिका घ्या असे आदेशच राज यांनी दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा, मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करा… मतदार याद्यांवर काम करा. युती संदर्भात काय करायचं? त्याचा निर्णय मी घेईल, तुम्ही फक्त कामाला लागा. यावेळी मुंबई महापालिकेत सत्ता आपलीच येणार, हे टाळ्या शिकण्यासाठी मी बोलत नाही. जुने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या, जे पक्षापासून दूर गेलेले आहेत, त्यांना सुद्धा एकत्र करून तयारीला लागा, असे आदेशही राज ठाकरेंनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *